जेएनयुच्या बेपत्ता विद्यार्थ्याच्या मातेचा आक्रोश , दिल्लीत मोर्चा
नवी दिल्ली : माझा नजीब कुठेय? तीन वर्ष झाली, त्याचा शोध का घेत नाही, असा आक्रोश नजिबच्या मातेने केला आहे.
नजिबची माता फतिमा नाफीस यांनी गृहमंत्रालयाला हा जाब विचारला आहे. तो बेपत्ता होऊन तीन वर्ष झाली. त्याचा शोध का घेतला जात नाही? असे त्यांचे प्रश्न आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारातून नजीब अहमद बेपत्ता झाला. त्याला मंगळवारी तीन वर्ष पूर्ण झाली. युनायटेड अगेन्स्ट हेट या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्त मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व नाफीस यांनी केले.
झुंडबळी ठरलेल्या तरबेझ अन्सारी यांची पत्नी शहिस्ता परवीन, हत्या झालेले पोलिस निरीक्षक सुबोध कुमार यांच्या पत्नी रजनीसिंग, गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. लेखिका अरुंधती रॉय, कार्यकर्त्या शेहला रशीद, बसपचे खासदार कंवर दानिश अली, प्रशांत भूषण, अपूर्वानंद, नंदिता नारायणन आणि साबिका अब्बास अली यांची भाषणे झाली.
अभावीपशी झालेल्या वादानंतर नजीब हा बेपत्ता झाला होता. मात्र यात सहभाग असल्याचा आरोप अभाविपने फेटाळून लावला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने गेल्या वर्षी तपास लागत नसल्याने तो थांबवला होता. त्याचा अहवाल दिल्ली उच्च न्यायालयात सादर केला होता. सर्व बाजून तपास करूनही त्याचा मागमूस लागत नसल्याचे त्यात म्हटले होते.