अनधिकृत टपऱ्या, पत्राशेडप्रकरणी 115 जणांवर फौजदारी गुन्हे
पिंपरी – रहदारीस अडथळा ठरणारी आणि अनधिकृतपणे उभारलेली सुमारे 14 हजार बांधकामे, टपऱ्या, हातगाड्या, पत्राशेड गेल्या वर्षभरात शहरात आढळली आहेत. त्यांच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत. यातील 807 बांधकामे पाडली असून, 115 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यासाठी पिंपळे सौदागरसह पिंपळे गुरव, वाकड आणि रहाटणीच्या काही भागांची निवड महापालिकेने केली आहे. तिथे “स्मार्ट’ कामे सुरु आहेत. मात्र, शहराचा अन्य भागही स्मार्ट व्हावा, यासाठी अर्बन स्ट्रीट योजनअंतर्गत रस्ते आणि पदपथांची कामे सुरु आहेत. यात वीस वर्षांपूर्वी महापालिकेत सामाविष्ट झालेल्या चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, दिघी, चिखली, तळवडे, वाकड, पुनावळे, रावेत, मामुर्डी, किवळे आदी गावांचाही समावेश आहे.
अतिक्रमण कारवाईतून वर्षभरात 28 लाखांवर दंड वसूल करण्यात आला. तसेच वर्षभरात 136 लोखंडी टपऱ्या, 168 टेबल, 84 वाहने, दोन हजार 278 फलक आणि पत्रा, ताडपत्री आणि कापडाचे 450 शेड काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. जानेवारी महिन्यात आठही क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर अतिक्रमणविरोधी मोहिम राबविण्यात आली असून यामध्ये सुमारे 50 हजार चौरस फुटांची पक्की बांधकामे पाडण्यात आली आहेत.