- करंदीमधील नागरिक जळीतग्रस्त ऊस उत्पादकाच्या मदतीला धावले
शिक्रापूर – करंदी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याच्या ऊसाला मंगळवारी दुपारच्या सुमारास शेजारी पेटविलेल्या पाचोळ्यामुळे अचानक आग लागली. परंतु यावेळी गावामध्ये कार्यन्वित करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे नागरिक शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
करंदी येथील मुखई रोडलगतच्या एका शेतकऱ्याने पाचोळा पेटविला. त्यावेळी वाऱ्यामुळे शेजारील बाळासाहेब बबन ढोकले यांच्या शेतातील तीन एकर उसाला आग लागली, याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे माहिती दिली. काही वेळामध्ये शेजारील नागरिक आग विझविण्यासाठी धावून आले. त्यांनतर मकरंद दरेकर, सूरज घाडगे, प्रणीत सातपुते, सतीश काटे, युवराज गुंजाळ, दादा ढोकले, शांताराम ढोकले, रामभाऊ बोत्रे, कल्याण ढोकले, विजय कदम, शशिकांत पांगरकर, अनिल झेंडे, दौलत पांगरकर, वसंत ढोकले, अक्षय ढोकले, रोहिदास गुंजाळ आदी नागरिकांनी पाणी, माती टाकली. उसामध्ये सरी पाडून त्यातील सुका पाचोळा दूर करीत आग विझविली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान टळले आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा बसविल्यामुळे माझ्या शेतामध्ये लागलेली आग विझविण्यासाठी एकाच वेळी असंख्य युवक व ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यामुळे माझे नुकसान आटोक्यात आल्याचे शेतकरी ढोकले यांनी सांगितले. तसेच सर्वांचे आभार मानले.
ग्रामसुरक्षा यंत्रणा गावच्या दृष्टीने महत्वाची – वंदना साबळे
पोलीस पाटील वंदना साबळे म्हणाल्या की, करंदी येथे शेतामध्ये लागलेली आग विझविण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे एकाचवेळी अनेक नागरिक धावून आले. त्यामुळे मोठी हानी टळली आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा ही गावांच्या दृष्टीने महत्वाची आहे. प्रत्येक गावामध्ये ही यंत्रणा राबवावी.