- ग्रामस्थांचा निर्णय : पवन मावळात साध्या पद्धतीने हरिजागर, सण, उत्सव
पवनानगर- पवनमावळ परिसरातील प्रभाचीवाडी, सावंतवाडी, ब्राम्हणोली, आंबेगाव, अजिवली, तुंग, चावसर, मोर्वे, जवन यांच्यासह पवना मावळातील ग्रामदेवतेचा उत्सव, यात्रा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय उत्सव समित्यांनी घेतला आहे. तीन-चार दिवसांपूर्वी शिवली गावची ही गावजत्रेत केवळ धार्मिक विधी अटोपून साजरी करण्यात आली आहे. मावळ तालुक्यात दत्तजयंती ते अक्षय तृतीया या कालावधीत गावोगावी यात्रा असतात.
आंदर आणि नाणे मावळातील अनेक गावांच्या जत्रा झाल्या आहेत. तर पवनमावळ परिसरात महिन्याभरात गावांच्या ग्रामदेवतांच्या जत्रा असतात, तर गावची जत्रा असल्यामुळे बाहेर गावी किंवा कामनिमित्त शहरात वास्तव्यास असलेले नागरिक उत्सवानिमित्त गावात येतात. गावच्या उत्सवांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताह, अभिषेक, महापूजा पालखी मिरवणूक, भजन, मानाचे बगाड व रात्री मनोरंजनाचे कार्यक्रमात भजनी भारुड, लावण्यांचा अथवा लोकनाट्य दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा असतो.
मात्र गेल्या काही दिवसांपासून करोना या संसर्गजन्य आजाराचे सावट निर्माण झाले. सध्या या आजाराचा संसर्ग जलदगतीने होत असल्याने गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करत स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकही याबाबत सतर्क झाल्याने गावजत्रांमध्ये मनोरंजन व गर्दीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. याशिवाय सण, उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तर गावजत्रा केवळ धार्मिक विधी करुन साजरा होणार आहे. सण, उत्सव साधेपणामुळे गावजत्रांमध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होणार आहे.
प्रभाचीवाडीतील रामजन्मोत्सव साधेपणाने…
पवनामावळ परिसरातील प्रभाचीवाडी गावामध्ये गुढी पाडवा ते श्रीराम नवमीपर्यंत श्रीराम कथा होते. गेल्या दोन वर्षांपासून या कथेचे आयोजन करण्यात येत आहे. या कथेचे हे तिसरे वर्ष होते. या कथेसाठी पवनमावळातील रामभक्त मोठ्या प्रमाणात येत असतात, तर पवन मावळातील प्रभाचीवाडी (महागाव) गावातील श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पवनमावळ परिसरातील सर्वात मोठी यात्रा असल्यामुळे या यात्रेसाठी आठ ते दहा हजार नागरिक उपस्थित असतात. करोना या रोगाचा संसर्ग जलद गतीने होत. असल्यामुळे व प्रशासनाने गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्यात यावे, असे सांगितल्यामुळे प्रशासनाला सहकार्य करते. गावातील ग्रामस्थांनी यंदा गावातील सर्व कार्यक्रम रद्द करुन साध्या पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
हरिनामाचा गजर थांबला…
करोना संसर्गजन्य रोगामुळे शासनाच्या विनंतीनुसार सावंतवाडी, शिवली येथील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी येथे गेली 68 वर्षे अखंडितपणे सालाबादप्रमाणे गुढी पाडवा ते पंचमीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व शेवटी भजनी भारुड व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम गाव यात्रामध्ये रंगत आणतात. परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. या वेळी परंपरा म्हणून ज्ञानेश्वरी पारायण व हरिजागर सावंतवाडी गावापुरता मर्यादित करण्यात येईल, असे सर्व समस्त ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा गावजत्रेसाठी सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने ग्रामस्थांच्या व भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. केवळ आवश्यक आणि धार्मिक विधी होतील, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
– विश्वनाथ जाधव, ग्रामस्थ, प्रभाचीवाडी.