मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मुंबई कॉंग्रेसला गटबाजीने ग्रासले आहे. आता ती गटबाजी थोपवून ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातून माजी खासदार संजय निरूपम आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी समर्थकाला तिकीट नाकारण्यात आल्याने मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष असणारे निरूपम नाराज झाले आहेत. त्यांनी नुकतीच नाराजी उघड करत कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नसल्याची घोषणा केली. त्यापार्श्वभूमीवर, मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना निरूपम यांच्यासह नाराज नेत्यांना बरोबर घेण्याची ग्वाही दिली.
मी निरूपम यांच्याशी चर्चा करणार आहे. उर्मिला यांच्याशी माझे आधीच बोलणे झाले आहे. त्या आता नाराज नाहीत. उर्मिला आणि निरूपम हे दोघेही कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास गायकवाड यांनी बोलून दाखवला. कॉंग्रेसच्या तिकिटावर उर्मिला यांनी मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीचे कारण देत उर्मिला यांनी मागील महिन्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.