पिंपरी, दि. 7 ( प्रतिनिधी) – गेल्या 45 दिवसांपासून बंद असलेले उद्योग पुन्हा सुरु होण्याच्या शक्यता आता दिसू लागल्या आहेत. उद्योग बंद असल्याने उद्योगनगरीतील 11 हजार उद्योग व लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगांसमोर असलेल्या अनेक अडचणींबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करुन उद्योग सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत सूचना केल्या.
“करोना’मुळे गेल्या 45 दिवसांपासून शहरातील सर्वच उद्योग बंद आहेत. बड्या कंपन्याना सुटे भाग पुरविणाऱ्या सुमारे 11 हजार लघुउद्योगांपुढे यामुळे संकट निर्माण झाले आहे. दूध, किराणा यांना सुरुवातीपासूनच परवानगी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता दारुची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे आणि इतर दुकानेही सुरु करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता शहरातील प्रतिबंधित भाग वगळून पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योगांनाही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मोबाइलवर चर्चा करुन शहरातील लघुउद्योजकांच्या अडचणी सांगितल्या. राज्यातील काही भागांमध्ये उद्योग सुरु करण्यात आले आहेत. परंतु शहरातील उद्योग बंद असल्यामुळे अर्ध्याहून अधिक कामगार गावाकडे निघून गेले. आता जे शिल्लक आहेत त्यांना हाताला काम मिळाले नाही तर तेसुध्दा रोजगाराच्या शोधात चाकण, तळेगावला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मोठ्या कंपन्यांनी ज्या ऑर्डर दिल्या आहेत त्याची वेळेत पूर्तता झाली नाही तर परिस्थिती कठीण होईल. उद्योजकांच्या अडचणी समजून घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी फोन करून महापालिका आणि पोलीस आयुक्त यांना रेडझोन वगळून कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता प्रशासन याबाबत विचार करत आहे. परंतु शासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश प्राप्त झालेले नसल्याने प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.