शहरातील विविध राजकीय पक्षांची मागणी…
इस्लामपूर (प्रतिनिधी) : इस्लामपूर शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था शहराच्या बाहेर महसुल प्रशासनामार्फत करण्यात यावी, अशी मागणी भाजप, युवक कांग्रेस, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना देण्यात आले.
उरूण-इस्लामपूर शहरात कोरोना रूग्ण आढळल्याने गेली ४३ दिवस शहर १०० टक्के बंद होते. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनास प्रामाणिक साथ दिल्याने शहराचा रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये शहराचा समावेश झाला आहे. परंतू शहरामध्ये काही नागरिकांना पुणे, मुंबई व इतर शहरातून आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी काही नागरिक बाधित असण्याची प्रचंड शक्यता आहे. नागरिक होम क्वारंटाइनचे पालन करत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना बाधा होवू शकते.
प्रत्येक कुटुंबावर शास्त्रशुध्द पध्दतीने लक्ष ठेवणारी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना इस्लामपूर शहरात आणण्यास आमचा विरोध नाही परंतू अशा सर्व नागरिकांना शहराबाहेर संस्थापक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी. १४ दिवसांचा निरिक्षणाचा कालावधी संपल्या नंतर त्यांना शहरात प्रवेश द्यावा. शहरातील इतर नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशी अपेक्षा आहे तरी बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतंत्र शहराबाहेर व्यवस्था करावी. याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा नागरिकांकडून उद्रेक होईल. असा उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक खोत, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस विजय पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष मकरंद करळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे उपस्थित होते.
इंस्टीट्यूशनल क्वारंटाइनसाठी शहरालगतच्या वसतीगृहांना अधिग्रहित करावे….
इस्लामपूर शहर व शहरालगतच्या परिसरातील शिक्षण संस्थांच्या वसतीगृहात प्रत्येक रूमला स्वतंत्र सोय आहे. त्यामुळे एकमेकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप कमी आहे. इस्लामपूर शहराजवळील प्रकाश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्या संस्थेमध्ये नागरिकांना इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन करण्यास संमती दिली आहे. शहरालगतच्या इतर शिक्षण संस्थेतील वसतीगृहांना क्वारंटाइनसाठी अधिग्रहित केल्यास यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.