जयपूर – करोनाग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या 277 भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आले असून त्यांना जोधपूर येथील लष्करी ठाण्यातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. इराणहून त्यांना थेट जयपूरला नियोजितस्थळी नेण्यात आले. लष्कराने तेथे राज्य सरकारच्या मदतीने विदेशातून आणलेल्या भारतीयांच्या विलगीकरणाची सोय केली आहे.
राज्य सरकारने अशा लोकांसाठी पुरेशा वैद्यकीय मदतीसह सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा तेथे उपलब्ध करून दिली आहे. या 277 पैकी 273 जण इराणला तीर्थयात्रेसाठी गेले होते. त्यांच्यात 149 महिला आणि मुलांचा समावेश आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या लोकांसाठी तेथे लष्कराचे डॉक्टर्सही तैनात करण्यात आले आहेत. ते त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या रिपोर्टची आता प्रतीक्षा आहे.