आपल्याच भावविश्वात रममाण झालेलं आपलं अंतर्मन आपल्या साठवणीतल्या आठवणींना अनन्यसाधारण महत्त्व देत असतं. अर्थात काही आठवणीच असतात तशा, अंतर्मनात घर करून राहिलेल्या. ह्यामध्ये अनेक सुख-दु:खांचे क्षण, घटना, घडमोडी, संवाद, वाद असं सर्व काही अंतर्मनावर कोरलं गेलेलं असतं. आपल्याला अगदी लहानपणापासूनच जे मिळालं, हाती लागलं, मनात आलं ते सारं काही साठवून ठेवायची सवयच लागून राहिलेली असते. अनेकांना, विकत घेतलेली पहिली वस्तू, कपडे, मिळालेलं गिफ्ट, बक्षीस, ग्रीटिंग, शालेय वस्तू अशा अनेक वस्तूंचा साठा करून त्या वस्तूंशी निर्माण झालेलं भावनिक नातं टिकवून ठेवायला आवडतं.
अर्थात, काही आठवणी साठवणीतल्या असतात, त्या आपल्या अंतर्मनावर कोरल्या गेलेल्या असतात. कितीही ठरवलं तरीही त्या पुसल्या जात नाहीत, म्हणूनच विसरायला होत नाहीत. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी आपल्याला नवी उमेद देऊ शकतात, नवा विचार देऊ शकतात, अनुभवातील काही चुकांमुळे नवनवीन मार्ग देऊ शकतात, हे निश्चितच खरं आहे; पण म्हणून त्यात आपण कितपत समरस, रममाण व्हायचं ह्याचंही आपल्याला भान राहाण्याची गरज असते. आपण परस्परांतील नातेसंबंधात देखील अनेकदा गतकाळातील संवाद, घटना, घडामोडी, विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यांचा सरधोपटपणे संबंध वर्तमानातील गोष्टीशी जोडत राहतो. त्यातील नकारात्मकता ही व्यक्तिगत संबंध बिघडायला अथवा काहीवेळा संपुष्टात यायला कारणीभूत ठरते. झालं गेलं विसरून जावं पुढे पुढे चालावं हे जीवनगाणं गातच राहावं लागतं, हे का बरं आपण समजून घेत नाही?
आपल्या अनुकरणप्रिय मनाला काहीवेळा आपल्या गतकाळातील अनुभवांचं अंधानुकरण करावं असं वाटत असतं.
आपण पूर्वी असं केलं, तेव्हा तसं झालं होतं, अशाप्रकारच्या यशप्राप्ती मिळालेल्या गतअनुभवाची पुनरावृत्ती व्हावी अशी आपली भ्रामक कल्पना असते. का बरं आपण असा अनेकदा विचार करतो? इतका का आपल्या गतकाळातील अनुभवांवर भरवसा असतो? पुन:श्च तसंच होईल अशी आपल्याला कोणत्या कारणानं खात्री वाटत असते? प्रत्येकवेळी नव्यानं विचार करून निर्णय घेण्याचा, कृती आणि व्यवहार करण्याचा, आपल्या विवेकी बुद्धीला नेमका कशामुळे विसर पडलेला असतो? एखादेवेळी कदाचित एखादी घटना, घडामोड, गोष्ट पूर्वीप्रमाणेच घडेल, असा अंधविश्वास आपण का ठेवतो? शिवाय नेहेमीच तशी ती घडेल हे कोणत्या कारणानं आपण गृहीत धरत असतो? आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण नवा असतो. येणारा प्रत्येक नवा क्षण आपल्यासाठी नवीन आव्हाने, आनंद घेऊन येत असतो. विशेषतः व्यक्तींचा परस्परांमध्ये झालेला विसंवाद, मतभेद ह्यामुळे निर्माण झालेला गैरसमज आणि कालांतरानं दुरावा, ह्यात देखील गतकाळातील अनुभवांमुळे, काही काळ-वर्ष बदल होत नाहीत. केवळ गतकाळातील घडलेला एखादा प्रसंग, त्यापुढील काळात आपापसातील संबंध बिघडायला कारणीभूत ठरल्याचं अनकेदा दिसून येतं.
पूर्वी एखाद्या रंगाचा पेहेराव केला, विशिष्ट वस्तू सोबत बाळगली, विशिष्ट वेळेलाच घराबाहेर कामासाठी पडलो, एखादे ठराविक काम ठराविक दिवशीच केल्याने आपल्याला हमखास भरघोस यशप्राप्ती होते, अन्यथा अपयश, नुकसान, मनस्ताप अटळ आहे; अशा अंधविश्वासाला बळी पडणे ही विवेकी विचारांची उणीव म्हणायची की विकृती? अशी झापडं आपल्या डोळ्यांवर लावल्यामुळे, आपल्याला वस्तुस्थितीचा विसर पडत जातो. वर्तमानात राहून आपल्या कर्तृत्वाच्या आधारे यशप्राप्ती करणं हे सुज्ञपणाचं लक्षण असतं. नवनवीन आव्हानं स्वीकारण्याचं धैर्य, कसब, कौशल्य आपल्यात निर्माण होण्याची गरज अधिक असते. ह्या आभासी दुनियेत स्वप्नवत जगायची सवय लागणं घातक ठरू शकतं. अपयश, नैराश्य पदरी आल्यावर दोष मात्र इतरांना, आपल्या नशिबाला, नाही तर मग दैवाला द्यायला सुरुवात होते. डोळ्यावरील भ्रमाची झापडं काढून वस्तुस्थितीची, परिस्थितीची जाणीव होणं आवश्यक असतं.
आपल्या जीवनातील बदल आपण सहजासहजी स्वीकारत नाही. आपण भूतकाळामध्येच गुरफटलेले असतो, त्यालाच कवटाळत बसलेले असतो. वर्तमानातही आपला भूतकाळ आपण घट्ट धरून बसलेले असतो. आपण भूतकाळातील अनुभव विसरायचं ठरवलं, तरीही विसरू शकत नाही. त्यावरच जीवापाड प्रेम करत राहत असतो. कालांतरानं निराशेच्या कचाट्यात सापडतो आणि आनंदाला मुकतो. आपल्या अंतर्मनातील विचारांना विशिष्ट दिशा, गती अथवा विषय असतीलच असं नाही. दिवसभरात आपल्या मनात आलेले सर्वच विचार, तसं बघितलं तर, आपल्या लक्षात देखील राहतातच असं नाही. ह्या विचारमंथनात आपल्याला वर्तमानातील वास्तवाचं भान राहणं महत्त्वाचं असतं. पण भूतकाळाच्या साठवणीतील आठवणीत रमलेल्या आपल्या अंतर्मनाला दुसरीकडे भविष्याची काळजी, चिंता करायची देखील सवय जडलेली असते. जीवनात आत्मिक आनंदाभूती प्राप्त करणं महत्त्वपूर्ण असतं. ही आनंदानुभूती आपल्या जगण्यापलीकडच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची, आवश्यक म्हणूनच गरजेची असल्याचं समजून घेणं जरुरीचं असतं.
आनंदानुभूती
विद्यानंद