नवी दिल्ली, – दिल्लीत धरणे धरून बसलेल्या आंदोलनाला शंभर दिवस पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने आज शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून आपली शक्ती पुन्हा एकदा दाखवून दिली. आज कुंडली मनेश्वर एक्स्प्रेस वेवर 11 ते 4 या पाच तासांसाठी रास्ता रोको करण्यात आले. या 136 किमीच्या एक्स्प्रेस वे वर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. काही ठिकाणी शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झालेले दिसले.
ज्या ठिकाणी रास्ता रोका आंदोलन करण्यात आले त्या भागातील टोल नाकेही बंद ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले होते. त्यानुसार या मार्गावरील टोल नाकेहीं बंद करण्यात आले होते. कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाहीं असा निर्धार भारतीय किसान युनियनचे प्रमुख राकेश टिकेैत यांनी आज पुन्हा एकदा पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. दरम्यान आगामी उन्हाळा लक्षात घेऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आपल्या तंबुंमध्ये कुलर आणि एसी मशिन बसवण्याचे काम सुरू केले आहे. त्यांची ही तयारी पाहिल्यानंतर त्यांनी येथे दीर्घकाळ आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला असल्याचे स्पष्ट दिसते आहे.