संजय राऊत ः लवकरच करणार भंडाफोड
मुंबई : भाजपने सत्ता स्थापनेसाठी अजित पवार यांना “ब्लॅकमेलिंग’ केले आहे, असा आरोप करतानाच त्याची कुठून सुरुवात झाली आणि त्याच्यामागे कोण आहे, याचा लवकरच भंडाफोड करणार, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी मला सल्ला देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बनवले आहे काय, असा सवाल करतानाच त्यांनी फक्त आपल्या पक्षाचा विचार करावा. आपल्या पक्षाला त्यांनी वाचवावं. चोरासारखे आपण जे वर्तन करीत आहात ना ते चंद्रकांत पाटील यांना महागात पडेल, त्यांनी तोंड सांभाळून बोलाव, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अजित पवार यांच्यासोबत 8 आमदार होते. त्यातील 5 आमदार पुन्हा माघारी आले आहेत. त्यांना खोटे सांगून, किडनॅपींग करून राजभवनावर नेण्यात आले होते, असा आरोप करतानाच धनंजय मुंडे यांचाही संपर्क झाला असून लवकरच इतर सर्व आमदार परत येतील. एवढेच नव्हे तर अजित पवारही परत येतील, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
पवार यांच्यावर आमचा पुर्ण विश्वास आहे आणि आम्हीच सरकार बनवणार. अंधारात जे सरकार बनले आहे, ते पाप आहे, असेही राऊत म्हणाले.