तब्बल 23 वर्षे प्रलंबित प्रकल्प ः कल्याण ते अहमदनगर मार्गाचा सर्व्हे पूर्ण
संजोक काळदंते
ओतूर- तब्बल 22 वर्षापेक्षा अधिक कालखंड रखडलेल्या शिवाय ठाणे, पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहत असलेल्या माळशेज रेल्वे मार्गाच्या प्राथमिक तांत्रिक सर्व्हेक्षण काम कल्याण ते नगर पूर्ण झाले असून, या मार्गावर एकूण 26 रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्यामुळे या रखडलेल्या माळशेज रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती उघडकीस आली आहे. या मार्गाचे तांत्रिक सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याचे समजते.
हा रेल्वे मार्ग पूर्णतः फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असून या तांत्रिक सर्व्हेचा प्राथमिक रिपोर्ट आला असला तरी अंतिम रिपोर्ट तयार करण्यात आल्यानंतरच तो रेल्वे बोर्डापुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे आणि त्याला मान्यता मिळण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्यामुळे हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे माळशेज पट्टा आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.
माळशेज रेल्वे धाऊ लागल्यास ठाणे, पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार असून त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहेत. शिवाय पर्यटन व्यवसायाला देखील चालना मिळणार असून, पर्यटन क्षेत्रात जुन्नर तालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविला जात आहे. यापलीकडे नगर-औरंगाबाद मार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्ग देखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो, त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार आहे.
- प्रस्तावित रेल्वेमार्ग
कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, माळशेज घाट, ओतूर ते नगर असा हा मार्ग जाणार असून, या मार्गावर कल्याण, विठ्ठलवाडी,उल्हासनगर, अंबरनाथ, कांभा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, डाहेरी मिल्हे, नागतार केबिन, वारीवघर केबिन, देवरूखवाडी
केबिन, मढ, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोटडावाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी, हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे . - हा मार्ग व्हावा म्हणून आजपर्यंत अनेक वर्षे राज्य माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून मोठा संर्घष केला आहे. आता या मार्गाचे काम सुरू होत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
– विजय वायकर, अध्यक्ष, माळशेज रेल्वे कृती समिती जुन्नर तालुका