एक लाख ग्रामपंचायती एकमेकांशी जोडणार
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात आज सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या काही योजनांची घोषणा केली. दरम्यान, ग्रामीण भागातील विविध सरकारी संस्था जोडण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रत्येक घरात फायबर आधारित इंटरनेट सुविधा देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात शनिवारी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. भारतनेटच्या माध्यमातून एक लाख ग्राम पंचायतींना जोडण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
देशात वेगवेगळ्या ठिकाणी डेटा सेंटर सुरू करण्यासाठी लवकरच नवे धोरण आखले जाईल, असे सांगून निर्मला सीतारामन म्हणाल्या, ग्रामीण भागातील सर्व सरकारी संस्था जोडण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. ग्राम पंचायती, पोलिस स्थानके यांना या माध्यमातून जोडण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामीण भागात प्रत्येक घरात फायबर नेट सुविधा देण्यासाठी भारतनेटचा वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशातील महत्त्वाच्या बंदरांचे व्यवस्थापन करणाऱ्या महामंडळापैकी एकाची शेअर बाजारात नोंदणी कऱण्यावरही सरकार विचार करीत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.