पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात लागू केलेली आचारसंहिता मंगळवारपासून (दि.30) अंशत: शिथिल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. आचारसंहिता अंशत: शिथिल झाल्यामुळे आता मंजूर झालेले विकास कामे आणि दुष्काळ निवारणाची कामे करता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्याच दिवसापासून पुण्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. पुण्यात पहिल्या टप्प्यात पुणे आणि बारामती, तर दुसऱ्या टप्प्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. त्यानंतर दि. 30 एप्रिलपासून पुण्यात आचारसंहिता अंशत: शिथिल होणार असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राज्यात यंदा दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सरकारबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या कामात व्यस्त होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. मतदानानंतर आचारसंहिता अंशत: शिथिल होणार असल्याचे दुष्काळ निवारणाला गती मिळेल. आचारसंहितेपूर्वी मंजूर झालेली विकासकामे व दुष्काळनिवारणाची कामे करता येणार आहेत.
आचारसंहिता अंशत: शिथिल झाली तरी, कोणताही मोठा निर्णय अथवा मंत्र्यांसोबत बैठक घेता येणार नाही. मतदान संपले असले तरी, निकाल लागेपर्यंत आचारसंहिता काही बाबतीत कायम असेल. त्यामुळे येणाऱ्या काळात यापूर्वी मंजूर झालेले कामे करण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र, त्यासंबंधी निवडणूक आयोगाकडून सल्ला मागितला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.