नवी दिल्ली – देशातील बेकायदा खाणकामांवर उपग्रहाद्वारे नियंत्रण ठेवले जात असून हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज लोकसभेत केला. ते म्हणाले की सरकारने लीजवर दिलेल्या सर्व खाणींवर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यातून बेकायदा खाणकामांवर चांगले नियंत्रण मिळवता आले आहे असे ते म्हणाले. या प्रणालीत पाचशे मिटर पेक्षा अधिक खोलीवर खाणकाम केले तर त्याची नोंद होते व त्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच संबंधीतांवर कारवाई केली जाते.
या प्रणालीतून सन 2016-17 या वर्षात 296 गैरप्रकार आढळून आले असेही मंत्र्यांनी नमूद केले. त्याची राज्यसरकारांमार्फत शहानिशा करण्यात आल्यानंतर त्यातील 47 गैरप्रकारांची खात्री पटली आणि त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.