सिद्धरामय्या यांना पडलाय प्रश्न
बंगळूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली. अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेनंतरही मोदी, मोदी नारा कायम कसा राहिला, असा सवाल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. त्यातून त्यांनी मोदींचा करिष्मा टिकून राहिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
सिद्धरामय्या यांनी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मागील मोदी सरकारच्या कामगिरीची खिल्ली उडवली. बेरोजगारी वाढली. रूपयाच्या मुल्यात घसरण झाली. देशांतर्गत उत्पन्नात घट झाली. तरीही देशातील जनतेने आणि प्रसारमाध्यमांनी त्या सरकारबाबत अनुकूलता दर्शवली. आर्थिक विकासासाठी मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळात काय केले? त्यांनी नोटाबंदी केली. त्याचा काय निकाल लागला असा प्रश्न माध्यमांनी भाजपला विचारायला हवा, असे ते म्हणाले.विकासाऐवजी भावनिक मुद्दे उपस्थित करून भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली, असा आरोप त्यांनी केला.
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याबाबतही सिद्धरामय्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले ते अजूनही समजलेले नाही. संरक्षण विभाग, पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्रालयापैकी कुणीच त्याविषयीची माहिती दिली नाही. भाजपने भावनिक मुद्द्यांवरून जनतेची केवळ दिशाभूल केली, असे त्यांनी म्हटले.