नवी दिल्ली – राफेल करारवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये दिले आहे. यावेळी ‘चौकीदार चोर है’ या विधानावर राहुल गांधींनी पुन्हा खेद व्यक्त केला आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही.
राफेल प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना राहुल गांधी यांनी, आता न्यायालयानेही चौकीदारही चोर है, वर शिक्कामोर्तब केले असल्याचे म्हटले होते. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात सोमवारी 22 एप्रिलला दिलगिरी व्यक्त केली होती. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना मी 10 एप्रिल रोजी राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल वाचला नव्हता. कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता,असे त्यांनी त्यावेळी प्रतिज्ञा पत्रात म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या या प्रतिसादावर समाधानी नसल्याचे म्हणत नोटीस बजावली होती.