दर्जा उंचावला : लोकसहभागाचा वाटा मोठा
– दिगंबर पडकर
माळेगाव – विविध ज्ञानशाखांची महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, साखर कारखाना असलेले माळेगाव हे बारामती तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव आहे. प्राथामिक शिक्षणाचा पाया म्हणून अंगणवाडीकडे पाहिले जाते. माळेगाव ग्रामपंचायतीमार्फत सध्या 15 अंगणवाड्या सुरू आहेत. या अंगणवाड्याचे मूल्यमापन करुन 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत 12 अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे.
या अंगणवाड्या स्वच्छ, सुंदर असून त्यांच्या इमारती उच्च दर्जाच्या आहेत. तसेच मुलांना खेळण्यासाठी गावातील बहुतांश अंगणवाडीत प्रशस्त बगीचा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच विविध खेळांचे साहित्यही परिसरात बसविण्यात आले आहे. वर्गात पंखे, दूरदर्शन संचाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अंगणवाडीतील मुलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून स्वतंत्र स्वयंपाकघराची व्यवस्था आहे. मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था आहे. विशेष म्हणजे या अंगणवाड्यांतील भिंती अक्षरे, चित्रे, आकृत्यांनी बोलक्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय संत, विविध प्राणी, पक्षी, फुले, रंगांचे तक्ते लावण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांची संख्या वाढू लागली आहे. या अंगणवाड्या केवळ भात वाटप केंद्र न राहता आदर्श अंगणवाड्या निर्माण झाल्या आहेत. गरोदर माता आणि किशोरी मुलींचे अंगणवाडीत येण्याचे प्रमाण वाढते आहे. आहाराबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येते.
अंगणवाडीच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे. लोकसहभागातूनच अंगणवाड्या आदर्श करण्यात आल्या आहेत. अंगणवाड्यासाठी ग्रामस्थाकडून वेळोवेळी शक्य होईल तेवढी मदत केली जाते. खुर्ची, टीव्ही, डिव्हीडी, कपाट, बोर्ड, खेळणी, युनिफॉर्म आदी गोष्टी पुरवण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतील प्रत्येक नोंदणीकृत बालक वजन आणि उंचीसाठी आलेच पाहिजे असा दंडक घालण्यात येतो. गोपाळपंगत माध्यमातून बालकांची उपस्थिती वाढविण्यात मदत होते. बालरोग तज्ज्ञांकडून बालकांची आरोग्य तपासणी केली जाते.
खासगी शाळेच्या तुलनेत शिक्षणाच्या बाबतीत अंगणवाडीतील मुले मागे पडू नये म्हणून आम्ही खासगी शाळांप्रमाणे मुलांना दर्जेदार शिक्षण देतो, तसेच मुलांना सकस आहार दिला जातो.
– वाय. एस. वाबळे, माळेगाव, अंगणवाडी व्यवस्थापक
“संत्री आहेत दातांचे मंत्री’
अंगणवाड्यातील फलकांवर सकस आहाराच्या म्हणी दिसतात- “जो पालेभाज्या खाईल तो सदा निरोगी राहील’, “गाजर, आंबा पपई खा, डोळ्याला भरपूर तेज करा’, “आवळा, संत्री, आहेत दातांचे मंत्री’, “ताक एक अमृत’, “भाजीपाला आणि कडधान्य खाऊन रोग होत नाही, मग डॉक्टरांकडे कशाला जायचे बाई’ अशा म्हणी अंगणवाड्यांमध्ये दिसतात. माता सक्षमीकरणासाठी सामाजिक लेखा परीक्षण केले जाते. अंगणवाडीतील मुलांना स्वच्छता अभियानाची माहिती दिली जाते.
परसबागेतील भाज्या आहारात
लहान मुलाच्या आहारात नियमित ताज्या फळभाज्यांचा समावेश असला पाहिजे या हेतूने येथे परस बाग फुलवण्यात आलेली आहे. या अंगणवाडीतील परस बागेत योग्य ती निगा राखून लावण्यात आलेल्या हिरवी मिरची, शेवगा, वांगी, भोपळा आदी ताज्या भाज्या येथील मुलांना आहारात दिल्या जातात.