नवी दिल्ली – मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये सध्या थोडी मंदी आली असली तरी ती नोटबंदीमुळे आलेली नाही. आणि नोटबंदीचा देशाच्या अर्थकारणावर काहीही विपरीत परिणाम झालेला नाही असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्या आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होत्या. भारत अजूनही जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शेवटच्या तिमाहींत अर्थव्यवस्थेत थोडी घट झाल्याचे दिसून आले असले तरी त्या अनुषंगाने आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारताचा विकास दर चांगला आहे असेही त्यांनी नमूद केले. पीएम किसान योजना, पेन्शन योजना अशा उपायांनी लोकांच्या हातात थेट पैसा जात आहे असे त्या म्हणाल्या. बॅंकांना उद्योजक आणि व्यावसायिकांना अधिक पत पुरवठा करावा असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.8 टक्के इतका होता. सन 2017-18 मध्ये तो 7.2 टक्के होता आणि त्याच्याही आधीच्या वर्षात तो 8.2 टक्के होता. देशाच्या जीडीपीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणांनाही चालना दिली जात आहे. केवळ आर्थिक विकासावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक समितीही नियुक्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.