पालिका, कॅन्टोन्मेंटच्या हद्दींमुळे विकास मात्र विस्कळीत
पिंपरी – पाण्याची व्यवस्था झाली. रस्ते झाले. मामुर्डीला शहरीकरणाचा स्पर्श झाला. मात्र, अद्याप विकासकामांसाठी पडलेली आरक्षणे विकसित झालेली नाही. महापालिका आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट अशी दोघांची हद्द असल्याने गावाचा विकास विस्कळित स्वरूपात झाला आहे.
गावातील सिद्धार्थनगर, राऊत वस्ती, आदर्शनगर, गजानन सोसायटी, आजादनगर, चिंतामणीनगर आदी भागाचा महापालिका हद्दीत समावेश होतो. तर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत मामुर्डी गावठाण, थॉमस कॉलनी, शितळानगरचा काही भाग समाविष्ट होतो. मामुर्डीमध्ये फेरफटका मारल्यानंतर गावाचा तोंडवळा बदलल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतागृह आदी प्रमुख सुविधा झाल्या. सध्या गावात असलेले रस्ते अरुंद आहेत. ते रुंद करण्याची गरज आहे. तसेच, ठिकठिकाणी पडलेले खड्डे दुरूस्त करणे आवश्यक आहे. आदर्शनगर ते मामुर्डी स्मशानभुमीपर्यंत असलेला रस्ता खडकाळ आहे. त्याचे तातडीने डांबरीकरण करणे गरजेचे आहे.
महापालिकेचा दवाखाना नसल्याने लोकांना उपचारासाठी देहूरोडला किंवा खासगी दवाखान्यांमध्ये जावे लागते. “पीएमपी’ची बस साईनगर (मामुर्डी) ते निगडी या अंतरात दर पाऊण तासाने आहे. पुण्याला जाण्यासाठी मात्र बस सुविधा नाही. नागरिकांना प्रथम निगडी येथे जावे लागते. त्यानंतर, तेथुन दुसरी बस बदलून पुण्याला जावे लागते. येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बोर्डाची प्राथमिक शाळा आहे. महापालिकेची शाळा व्हायला हवी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
“मामुर्डी गावात पाण्यासाठी जलवाहिनी टाकल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. ड्रेनेज, वीज आदी प्रमख सुविधा केल्या आहेत. विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. ज्या रस्त्यांची दुरूस्ती आवश्यक आहे, त्यासाठी दुरूस्ती केली जात आहे.
– मनोज खानोलकर, माजी नगरसेवक.
साडेसहा हेक्टर क्षेत्राचा ताबा बाकी
मामुर्डी येथे विकासकामांसाठी 17 आरक्षणे टाकली आहेत. त्याचे एकुण क्षेत्र 7.24 हेक्टर इतके आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महिलांसाठी प्रसुतिगृह, बस थांबा, उद्यान, शॉपींग सेंटर, रिटेल मार्केट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे आदी प्रमुख आरक्षणांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यातील 0.74 हेक्टर इतकेच क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात आले आहे. म्हणजे तब्बल 6.50 हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा बाकी आहे.
“विकास आराखड्यातील 2 रस्त्यांची कामे दिवाळीपर्यंत सुरू होतील. त्यासाठी काही शेतकऱ्यांकडून जमिनीचे ताबे घेणे बाकी आहे. सिद्धार्थनगर भागात ड्रेनेज लाइनचे काम केले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खुल्या गटाराचे पाणी आझादनगर नाल्याला मिळते, ही बाब आरोग्यासाठी घातक आहे. उद्यानासाठी आवश्यक जागेचा ताबा मिळाल्यानंतर त्याचे काम सुरू होईल. साईनगर येथील विकास आराखड्यातील मुख्य रस्त्याचे काम केले जाणार आहे. आदर्शनगर ते सिद्धार्थनगर या अंतरातील रस्त्याचे टप्पानिहाय डांबरीकरण व कॉंक्रीटीकरण केले जाणार आहे.”
– बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेवक