लातूर (प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आता तीव्रपणे जाणवू लागली आहे. गेली काही दिवस शहरी व गावभागातील नागरीक मतदानात व्यस्त होता. या दरम्यान पाण्याच्या तीव्रतेची ओरड झाली नाही. पण, मतदानानंतर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती वाढली असून याची दाहकता अधिकपणे जाणवत आहे.
जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात कमी टॅंकर असल्याचे सांगितले जात असले तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई म्हणजे सहन होत नाही, सांगून उपयोग नाही अशी अवस्था बनली आहे. जिल्ह्यामध्ये काही टॅंकर चालू आहेत, तर 450 हून अधिक बोअर अधिग्रहीत करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक बॅरलची मागणी वाढली आहे. पिण्यासाठी जारचे पाणी म्हणून ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात या पाण्याचा व्यवसाय केला जातो. मात्र, सांडपाण्यासाठी, पशुधनासाठी, कपडेलत्ते धुण्यासाठी पाणी मिळतच नाही. ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंब दररोज 30 रुपयांचे जार घेवून पाणी पिऊ शकत नाही. ते उपलब्ध पाणीच पितात. क्षारयुक्त पाणी पिल्याने आजारालाही सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून तीव्रतेने दखल घेवून जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अधिक माहिती घेतली असता उद्या 25 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात येणार आहे.