कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या तक्रारीनंतर आता पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी या गावातील जमिनी खचली आहे. या प्रकारामुळे गावातील सहा कुटूंबातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. या कुटूंबांचे स्थलांतर करुन त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आदेश पन्हाळ्याचे तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पन्हाळा तालुक्यातील नावलीपैकी जांभळेवाडी येथील जमिनीचा काही भाग खचलेला असल्यामुळे गावातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात जांभळेवाडी येथील ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे सूचना दिली होती. तहसिलदारांनी तत्काळ संबंधित तलाठ्यांना यासंदर्भात चौकशी करुन अहवाल देण्यास सांगितले होते. तलाठ्यांनी 8 जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन या जमिनी खचत असल्याचा अहवाल तहसिलदारांकडे दिल्यानंतर या कुटूंबांचे स्थलांतर करण्याबाबतच्या सूचना पन्हाळा गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.