कोल्हापूर- उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व शेती बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थाचे धनंजय डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन पुणे व शेती उत्पादन समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रध्दानंद सांस्कृतिक हॉल, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे हापूस व केशर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाबासो लाड, संगिता पाटील, पी.डी.सावंत, सुभाष घुले, भगवान काटे, शेखर येडगे, बाबुराव खोत, अनिल पवार, मोहन सालपे उपस्थित होते.
यंदाच्या वर्षी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बारामती, इंदापूर, पनवेल, सोलापूर, अकलूज व सांगली इत्यादी शहरांमध्ये पणन मंडळाच्या माध्यमातून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. कोल्हापूर शहरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर जिल्ह्यातील 20 आंबा उत्पादक शेतकरी आंबा महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत.
दि. 30 मे ते 2 जून 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या आंबा महोत्सव कोल्हापुरकरांसाठी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहील. आंबा महोत्सवामध्ये ग्राहकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व कोकणातील नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूस व केशर आंब्याची चव चाखावी असे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले व सचिव मोहन सालपे यांनी केले आहे.