चाफळ – डोंगरी व दुर्गम भाग असलेल्या चाफळ विभागात चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. या पावसाने खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यात शेतकरी मग्न झाल्याचे पहायला मिळत आहे. काही ठिकाणी पेरणीपूर्वी मशागत करताना शेतकरी दिसून येत आहेत.
पावसाळ्यात अतिवृष्टी, उन्हाळ्यात कडक उन्हाळा व हिवाळ्यात अतिथंडी अशा परिस्थितीचा सामना करीत चाफळ परिसरात खरीप हंगामाच्या पेरण्या कोरड्या मातीत म्हणजे धूळ वाफेवर केल्या जातात. मुबलक पावसामुळे एकवेळ पाऊस सुरू झाला की तो सहसा उघडत नाही. त्यामुळे येथे भात हेच मुख्य पीक घेतले जाते. त्याबरोबरच हायब्रीड, सोयाबीन, भुईमूग, मका, धने, दारकू, नाचणी, वरी, सूर्यफूल, कडधान्य, आदीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चालूवर्षी एक ते दोन उन्हाळी पाऊस झाला. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती करायला शेतकऱ्यांनी संधीच मिळालेली नाही. या विभागात मान्सून मृग नक्षत्रानंतर सुरू होतो. त्यामुळे पेरण्या धुळवाफेवर कराव्या लागतात. चार दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने पेरणीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या पेरणीत मग्न आहे. पेरणी व टोकणीची कामे हातघाईवर आल्याने शिवार फुलून गेली आहेत.