-सत्यवान सुरळकर
या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी समस्त मानवजातीसाठी केलेल्या कार्याचा आदर म्हणून बुद्धपौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा किंवा वैशाखी पौर्णिमा संपूर्ण जगात साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमेस बुद्धांची पूजा करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. वैशाख पूजा तीन घटनांमुळे साजरी केली जाते. या दिवशी बुद्धांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच वैशाख पौर्णिमेस बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणून या दिवसाला वैशाख पूजा दिन मानले जाते.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तीन महत्त्वाचे प्रसंग बुद्धांच्या जीवनात घडलेले आहेत. लुंबिनी येथील वनात सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इ.स.पू. सहाव्या शतकात बुद्धांचा जन्म झाला. वयाच्या 35व्या वर्षी बोधी वृक्षाखाली गया येथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती, दिव्यत्व प्राप्त झाले. वयाच्या 80व्या वर्षी सतत 45 वर्षे ज्ञानप्राप्तीनंतर धम्मची शिकवणूक, सत्याचा मार्ग सांगितल्यावर, साल वृक्षाखाली कुशीनगर येथे त्यांना महानिर्वाण प्राप्त झाले. ह्या तीनही घटनांचा योगायोग म्हणावा लागेल. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महानिर्वाण ह्या तीनही घटना वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी घडलेल्या आहेत.
वैशाख पूजा थायलंड, भारत, श्रीलंका, बांगलादेश, लाओस, चीन, जपान, कोरिया, मंगोलिया, इंग्लंड, सोव्हिएत युनियन, अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये साजरी करतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध उपासक विहारात एकत्र येऊन सोबत फुले, मेणबत्ती व अगरबत्ती ठेवतात. बुद्धांप्रती भिक्खूसमवेत पूजा करतात. पंचशील ग्रहण करतात. बुद्धांची प्रतिमा किंवा मूर्ती उजव्या बाजूस राहील त्या कृतीने तीन वेळा विहारामध्ये प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा करताना बुद्ध, धम्म व संघाविषयी व सदाचाराविषयी स्मरण करतात.
कोणतीही वाईट कृत्ये करू नये, सतत चांगले कार्य करावे व इतरांना मदत करावी, मन शुद्ध ठेवावे ही बुद्धांची प्राथमिक शिकवण आहे. यातील पहिले तत्त्व वाईट कृत्ये करू नये म्हणजे हत्या, चोरी, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये, मद्यपान करू नये. दुसरे तत्त्व सतत चांगली कृत्ये करावीत म्हणजे, आपण प्रामाणिक, सत्यवादी, जागृत असावे. आपण नेहमी करुणा व दया, शांती आचरणात आणावी. तिसरे तत्त्व मन शुद्ध ठेवावे म्हणजे, आपले मन द्वेष, मत्सर, भ्रम, उत्कट इच्छा यांपासून परावृत्त करावे. चांगली विचारसरणी असल्यास मन शुद्ध ठेवता येते. ही बुद्धांची शिकवण आत्मसात केली पाहिजे व आचरणात आणली पाहिजे. त्यानंतरच आपणास शाश्वत सुख प्राप्त होईल. वैशाख दिनानिमित्त या तीन तत्त्वांचे आचरण केल्यास सर्व सजीवांविषयी करुणा वृद्धिंगत होईल. बुद्धांनी सांगितलेले चार आर्यसत्य हा बुद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः 2 हजार 575 वर्षांपूर्वी बनारस जवळील सारनाथ येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता.त्यावेळी चार आर्यसत्य त्यांनी सांगितली होती.
पहिले आर्यसत्य : दुःख
दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, क्लेश आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अपप्राप्ती म्हणजे दुःख होय. हे प्रश्न इच्छा नसणारे प्रश्न आहेत. लोक हे प्रश्न टाळण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्न करतात व त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. हे आर्यसत्य समस्यांशी निगडीत आहे. हे आर्यसत्य प्रतिपादन करून, समस्याविषयक परिस्थिती व तिचे आकलनविषयी मदत करते. ह्याकरिता प्रथम आत्मपरीक्षण आवश्यक आहे. आत्मपरीक्षणाशिवाय हे आर्यसत्य पूर्ण होत नाही. काळजीपूर्वक निरीक्षणावरून स्पष्ट होते की जीवन हे अस्थिर आहे.
दुसरे आर्यसत्य : दुःखाचे मूळ
बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते. त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते.
तिसरे आर्यसत्य : दुःख निरोध
बुद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे की दुःख निरोध, लोभ, द्वेष व भ्रम यांचा शेवट करणे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे. धम्म आचरणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याशिवाय तृष्णा क्षीण होत नाही.
चौथे आर्यसत्य : दुःख निरोधासाठी मार्ग
बुद्ध धम्म जीवन जगण्याचा मार्ग दर्शवितो. धम्म म्हणजे नीती होय. नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोधन होय. आपण नीती आचरणात आणावी. केवळ नीतीच आपल्याला निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचवू शकते. त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्यात 8 घटकांचा समावेश आहे. त्यालाच मध्यम मार्गसुद्धा म्हणतात. अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मगती, सम्यक समाधी यांचा समावेश आहे. थोडक्यात, कोणत्याही समस्यांची उकल करण्यासाठी शीलाचे पालन आवश्यक आहे. प्रज्ञा, शील व करुणा या तीन बाबींना धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. या तीन बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे. काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा या दुःखाच्या मुळाशी असतात. तृष्णेवर प्रभूत्व प्राप्त करणे म्हणजे तो जीवनातील सर्वात मोठा विजय होय.
वयाच्या 29व्या वर्षी एका अंधाऱ्या रात्री सर्व ऐश्वर्य, राजमहाल, संपत्ती, सुंदर पत्नी, प्रिय पुत्राचा जगाकरिता सुख शोधण्याच्या कार्यासाठी त्यांनी त्याग केला. 6 वर्षांच्या भ्रमंतीनंतर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती होऊन ते सिद्धार्थाचे “बुद्ध’ झाले. सतत 45 वर्षे भारतभर शाश्वत जीवनमार्गाचा संदेश देत बुद्ध भ्रमण करीत राहिले. शेवटी वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सालवृक्षाखाली महापरिनिर्वाण प्राप्त केले. त्यांनी या जगासाठी मौल्यवान, चिरस्थायी व जीवनाच्या खऱ्या सुखाच्या मार्गाची शिकवण मागे ठेवली.