नवी दिल्ली: सन 2020 पर्यंत ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधानींची शहरे रेल्वेच्या ब्रॉडगेजने जोडली जाणार आहेत अशी माहिती सरकारच्यावतीने आज राज्यसभेत देण्यात आली. सध्या आसाम, त्रिपुरा आणि अरूणाचल प्रदेश या तीन राज्यांच्या राजधान्या ब्रॉडगेजने जोडण्यात आल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांनी सांगितले की सिक्कीम वगळता सर्व राज्यांच्या राजधान्या ब्रॉडगेजने जोडण्याचा जो कार्यक्रम निश्चीत करण्यात आला आहे तो निर्धारीत कालावधीत पुर्ण होईल.
सन 2014-19 या पाच वर्षांच्या अवधीत देशातील रेल्वे मार्गाची उभारणी, डबल लाईन टाकणे किंवा मार्ग ब्रॉडगेज करणे यासाठी दरवर्षी सरासरी 25 हजार 894 कोटी रूपयांचा खर्च सरकारने केला आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या आधी सन 2009 ते 2014 या अवधीत दरवर्षी सरासरी 11 हजार 527 कोटी रूपये खर्च होत असत. पण एनडीए सरकारच्या काळात रेल्वे मार्गावर दरवर्षी 125 ट्क्के अधिक निधी खर्च केला जात आहे अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.