नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा या निवडणुकीत मिळतील असा विश्वास गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला आहे. एनडीएला दोनतृतीयांश बहुमताची शक्यताही नाकारता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
आज भाजप मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की सन 2014 मध्ये लोकांना मोदींकडून आशा होती पण यावेळी लोकांना मोदींबद्दल विश्वास आहे. त्यामुळेच भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्यावेळची लढाई मोदी विरूद्ध मनमोहनसिंग अशी होती पण यावेळी मोदींच्या विरोधात नेमका कोण आहे हेच समजेनासे झाले आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली. मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा नीच या शब्दप्रयोगाचे समर्थन केले आहे त्यावर कॉंग्रेसने खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली.