भोरगिरी-आहुपे-साखरमाची मार्ग खुणावतोय
निसर्ग पर्यटनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न
– गायत्री वाजपेयी
पुणे – पावसाळ्यातील निसर्गपर्यटन म्हणजे शेकडो पुणेकरांचा जीव की प्राण. नेहमीच्या ठिकाणांपेक्षा वेगळ्या वाटा शोधण्याच्या प्रयत्न अनेकांकडून केला जातो. या पर्यटकांसाठी आता भोरगिरी-आहुपे-साखरमाची मार्गावर निसर्गपर्यटनाचा (इको टुरिझम) पर्याय उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी वनविभागाकडून विविध सुविधांची उभारणी केली जाणार आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांना भेटी देण्याची, येथील पर्वतराजींमध्ये मनसोक्त फिरण्याची हौस अनेकांना असते. मात्र, अनेकदा माहिती आणि मुलभूत सुविधांच्या अभावामुळे इच्छा असूनही काही ठिकांणांवर पर्यटकांना जाता येत नाही. भिमाशंकर येथील आहुपे गाव हे देखील त्यापैकीच एक आहे. कोकणकड्यावरील शेवटचे गाव अशी ओळख असलेले हे गाव म्हणजे धाडसी पर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. कोकणकडा, घनदाट हिरवाई, मूसळधार पाऊस आणि वन्यप्राण्यांचा वावर हे आहुपे गावाचे वैशिष्ट्य आहे. गावाला लागूनच असलेला भोरगिरी किल्ला आणि कोकणात उतरण्यासाठी असलेला मार्ग यामुळे आहुपे गाव हे निसर्ग पर्यटकांसाठी एक आदर्श ठिकाण ठरते. मात्र, मुलभूत सुविधांचा अभाव आणि याठिकाणाबाबत फरशी माहिती नसल्याने पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद या ठिकाणाला मिळत नाही. त्यामुळेच वनविभागाकडून यंदा आहुपे येथे निसर्ग पर्यटनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
या पर्यटनादरम्यान येथील निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचणार नाही, याची काळजीदेखील घेतली जाणार आहे. मात्र निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध क रून देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. सोयी-सुविधांच्या उभारणीबरोबरच कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पॅकेज स्वरूपात विशेष सवलती उपलब्ध करून देण्यासाठी देखील विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक नागरिकांचीही मदत घेतली जाणार आहे.’
भिमाशंकरजवळील आहुपे गाव हे निसर्ग पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी यापूर्वी “टेंट’ची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, अजूनही याठिकाणी पर्यटकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने याठिकाणी आणखी काही सुविधा उपलब्ध करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.
– आर.के. वानखेडे, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग.