खासदार आढळराव पाटील ः खेड घाट, नारायणगाव बाह्यवळण काम जलदगतीने
राजगुरूनगर- पुणे-नाशिक महामार्गावरील खेड-सिन्नर चौपदरीकरण प्रकल्पातील उर्वरीत बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी सातत्याने जातीने लक्ष घातल्यानेच कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या प्रकल्पाची अशक्य वाटणारी स्वतंत्र निविदा निघू शकली. त्यामुळे कुठलीही ठोस कृती न करणाऱ्या विरोधकांनी नसते उद्योग थांबवावेत, असा टोला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.
खेड-सिन्नर रस्ते चौपदरीकरण प्रकल्पामधील उर्वरीत बाह्यवळण कामाबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, कोणाची मागणी नसतानाही भविष्यातील गरज लक्षात घेऊन मी केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या प्रकल्पाला सन 2013मध्ये मंजुरी मिळवली होती व 2014मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. हा प्रकल्प 80 टक्के पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवाने या महामार्गावरील बाह्यवळणाची कामे कशामुळे रखडली हे समजून घेण्याऐवजी व सकारात्मक पद्धतीने हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला व शासनाला मदत करण्याऐवजी केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच राष्ट्रवादीच्या सर्व पुढाऱ्यांनी आजपर्यंत या विषयाकडे पाहिले आहे.
मुळात, भूसंपादन वेळेत झाले नाही हा मुद्दा घेऊन या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात सुमारे 400-450 कोटींच्या नुकसान भरपाईसाठी कोर्टात दावा केल्याने हे बाह्यवळणाचे काम स्वतंत्र मंजूरी देऊन पूर्ण करणे ही अशक्यप्राय बाब होती. एका बाजूला कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचा कोर्टात वाद सुरू होता तर दुसरीकडे आयएलएफएस कंपनी तोट्यात गेल्याने त्यांना जमिनी ताब्यात येत गेल्या तरीही उर्वरीत बाह्यवळणाचं काम करता येणे अशक्य झाले. अशा किचकट परिस्थितीतदेखील मी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चेअरमन, सचिव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून तसेच लोकसभेत याविषयी जोरदार आवाज उठवून या बाह्यवळण कामांना सुमारे 400-450 कोटींचा स्वतंत्र निधी मंजूर करून घेतला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांच्यामध्ये कायदेशीर वाद सुरू असतानादेखील मी सर्व पर्याय वापरून व जोरदार पाठपुरावा करून अतिरीक्त व स्वतंत्र निधीची विशेष बाब म्हणून तरतूद करण्यास सरकारला भाग पाडले. एवढे करूनदेखील कायदेशीर वाद असल्यामुळे या बाह्यवळणाची स्वतंत्र निविदा काढण्यास ठेकेदार कंपनीने आक्षेप घेतला. पुन्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून कंपनीने स्वतंत्र निविदा निघणाऱ्या उर्वरीत कामात आडकाठी आणू नये याविषयी कंपनीला समजावून सांगितले. त्यानंतर कंपनीने ना हरकत देण्यास तयारी दर्शविली व निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. या सर्व प्रक्रियेला व निविदा निघण्यासाठी ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंतचा कालावधी लागला. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहिता लागण्याच्या केवळ दोन दिवस अगोदर रोड वे सोल्युशन या कंपनीला कामासाठीचे इकरारपत्र मिळाले. मात्र अंतिम वर्क ऑर्डरसाठी लागणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही काळ लागणार होता. तरीदेखील कंपनीने कामाला सुरूवात करावी, अशी आपण कंपनीला केलेली सूचना मान्य करून खेड घाटात काही अंशी कामाला सुरूवात झाली. मात्र आचारसंहिता लागल्यानंतर अद्यापपर्यंत ठेकेदार कंपनीला अंतिम वर्क ऑर्डर मिळू शकलेली नाही. येत्या 8-10 दिवसांत आचारसंहिता संपल्यावर कंपनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कामाची अंतिम वर्क ऑर्डर मिळून खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणाचे काम जलदगतीने सुरू होईल यात तीळमात्र शंका नाही.
- मंचर, राजगुरूनगर बायपासचे कामही पूर्ण करणार
राजगुरूनगर, मंचर बायपासची जागा अद्याप पूर्ण ताब्यात आलेली नाही. कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये कायदेशीर वाद सुरूच आहे; मात्र ज्या पद्धतीने खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणाचा तिढा आपण सोडविला, त्याच पद्धतीने उर्वरीत बाह्यवळण कामांमध्ये असलेले अडथळेदेखील मीच कसोशीने पूर्ण करणार आहे, असा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.