इंदापूर तालुक्यातील भीषण वास्तव : उभा ऊस करपला, शेतकरी चाऱ्याच्या शोधात
भवानीनगर- उन्हाळ्याच्या झळा इंदापूर तालुक्यात वाढल्याने तालुक्यातील बहुतेक भागातील पिके पाण्याविना जळू लागली आहेत. शेतकरी मात्र, हे चित्र रोज हताशपणे पाहत असूनही दुष्काळाचा वणवा पेटला आहे. इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. याकडे राजकारणी नेत्यांचे लक्ष नाही. लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात व्यस्त असलेले नेते शेतकऱ्यांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.
यंदा उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारीत जाणवू लागलेली होती. त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेली आहे. सध्या पारा चाळीशीवर पोहचल्याने पिके पाण्याविना खाक होत आहेत. विहिरी पूर्णपणे आटल्या असून काही विहिरींच्या तळाशी पाणी फक्त गुढघाभर आहे. ही भीषणता शेतकऱ्यांची झाली आहे. इंदापूर तालुक्यात अकोले, धायगुडवाडी, वायसेवाडी, कळस, म्हसोबाचीवाडी भागातून खडकवासला उजवा कालवा जातो. सध्या या कालव्याला पाणी आलेले असतानाही हे पाणी फक्त दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळत आहे. उन्हाळा कडक असल्याने हे पाणी कालव्याने इंदापूर तालुक्यापर्यंत पोहोचतच नाही, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत. इंदापूर तालुक्यातील काही भागातील ज्वारीचे पिक तर पूर्णपणे वाया गेले आहे. कडक उन्हामुळे उसाचे पिक मुळापासून पाण्याविना जळून चालेले आहे. उसाचे फक्त पाचट उभे राहिले आहे.
हिरवा चारा उरलेला नाही. जो ऊस शेतात आहे, तो ऊस तोडून जनावरे जगविण्यासाठी तोडायचा विचार केला तरीही शेतात उभा असलेला उसही मुळापासून जळून गेल्याने जनावरांना ऊस राहिलेला नाही. शेतकऱ्यांपुढे यंदा जनावरे कशी जगवावीत, हाच प्रश्न पडलेला आहे. पाण्याविना जमिनी ओस पडल्या आहेत. जमिनीत भेगा (भळी) पडलेल्या जागोजाची दिसत आहेत.
- दुष्काळाचा पाश…
इंदापूर तालुक्यात सध्या बहुतांश गावात पाण्याचे हाल सुरू झाले आहेत. काही गावांत पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालेला आहे. दरवर्षी उन्हाळा वाढतच जात असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळा आला की पाण्याचे संकट दिवसेंदिवस विळखा घालत आहे. यातून शेतकऱ्यांना कोणताही मार्ग आतापर्यंत तरी दिसलेला नाही. या भागातील शेतकऱ्यांनी शेतातील कोणत्या पिकाच्या आशेवर जगायचे व संसार कसा चालवायचा, हाच यश प्रश्न उभा राहिला आहे.