बंद कामामुळे घडतात अपघात ः प्रशासनाने दखल घेण्याची गरज
वासुंदे- केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अहमदनगर ते बारामती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून, या महामार्गावरील काही ठिकाणी कामे बहुतांश ठिकाणी पुर्णत्वास आहेत, तर काही ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. मात्र दौंड तालुक्यातील काही ठिकाणी अर्धवट असलेली कामं वाहनचालकांसाठी आणि प्रवाशांसाठी डोकदुखी ठरत आहेत.
हा प्रस्तावित महामार्ग दौंड तालुक्यातील कुरकुंभ, जिरेगाव, वासुंदे हद्दीतून जातो; परंतु महामार्गाचे काम सुरू असताना कुरकुंभ, वासुंदे, जिरेगाव येथील शेतकऱ्यांनी या कामास तीव्र विरोध केला, त्यामुळे महामार्गावरील कामे आहे त्या स्थितीत बंद करण्यात आली होती.
शेतकरी व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उर्वरित जमिनीची रीतसर मोजणी करून मोबदला द्यावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाकडून अल्प प्रमाणात कार्यवाही झाली. मात्र, मोबदल्याच काही ठोक आश्वासन नसल्याने आणि त्या सूचना या सुचनाच असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने अर्धवट कामे बंद करण्यात आली आहेत. हा महामार्ग मध्येच खोदला असल्याने रात्रीच्या वेळी येथील खड्डे दिसून न आल्याने अपघात होत आहेत. सध्या रिमझिम पावसाने पर्यायी मार्गावर दलदल निर्माण झाली आहे, त्यामुळे हे काम त्वरीत व्हावे, अशी मागणी होत आहे.
- वाटसरूची सुरक्षितता रामभरोसे
संबधित ठेकेदार किंवा विभागाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे, याप्रश्नी संबधित अधिकाऱ्यांवरच कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न प्रवाशी करेत आहेत - महामार्गावरील धोकादायक स्थिती पाहता ठेकेदार अर्धवट काम करून जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. मोठा अपघात झाल्यावर संबंधित अधिकारी व ठेकेदारांना जाग येईल.
– हरीदास लाळगे, माजी सरपंच, जिरेगाव