नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर संघात दुफळी माजली असल्याचे वृत्त अनेकांनी दिले होते. ही दुफळी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या दरम्यान झालेल्या वादांमधून झाली असल्याचेही अनेकांनी सांगितले. मात्र, हे वृत्त बीसीसीआयसह अनेक क्रिकेटपटूंनी नाकारले आहे.
तसेच भारतीय क्रिकेट संघ आज वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा बरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे. आता यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मैदानाबाहेर त्यांच्यात जरी मतभेद असले तरी त्यास अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही अस मत मांडले आहे.
कपिलदेव म्हणाले की, ‘मैदानाबाहेर मतभेद असले तरी फारसा फरक पडत नाही. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यात मैदानावर चांगला सुसंवाद आहे आणि हे दोन्ही खेळाडू देशहितासाठी खेळतात हे आपण पाहिले आहे. त्यामुळेच मैदानाबाहेर त्यांच्यात जरी मतभेद असले तरी त्यास अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही’.