दिलीप वळसे पाटील : मलठण येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचारार्थ सभा
टाकळी हाजी- खासदारांनी गेली पंधरा वर्षे विविध प्रश्न झुलवत ठेवल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिल्याने बेरोजगारी वाढली. यामुळे आता युवक-युवतींनी खासदार बदलासाठी परिवर्तनाची हाक दिली आहे. निष्क्रिय खासदारांना घरी बसविण्याची संधी मतदारांना आली आहे. या शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी निष्क्रिय खासदारांचा पाढा वाचला.
शिरुर लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे मलठण (ता. शिरूर) गावामध्ये ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले, त्यावेळी आयोजित सभेत दिलीप वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार पोपटराव गावडे, देवदत्त निकम, राजेंद्र गावडे, प्रदिप वळसे-पाटील, सोपानराव भाकरे, सुनीता गावडे, मनिषा गावडे, अरुणा घोडे, मानसिंग पाचुंदकर, सरपंच दामुअण्णा घोडे, योगेश थोरात, वसंत पडवळ, संदीप गायकवाड, उपसरपंच अजित गावडे, दत्तोबा दंडवते, सरपंच सुहास थोरात, उपसरपंच वंदना राजगुरु, कैलास कोळपे, लता गायकवाड, सखाराम मावळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, देशात, राज्यात मोदी विरोधी लाट आली आहे. सर्व स्तरातील नागरिक मोदी सरकारच्या जुलमी कारभारामुळे अगदी पिचुन गेला आहेत. सरकारच्या तुघलगी कारभारामुळे मंदीच्या लाटेत अनेकजण देशोधडीला लागले, त्यामुळे यंदा परिवर्तन घडवायचे आहे, याचा निर्धार करा. या निवडणुकीत आपण सर्वांनी डॉ. कोल्हे यांना खासदार म्हणून पाठवायचे आहे, असे त्यांनी नमूद केले. या मतदारसंघाच्या विकासासाठी मला एक संधी द्यावी, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.
- निष्क्रिया खासदारामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही. सवंग घोषणा करुन मतदारांना भुलवत तीनवेळा खासदार झालेल्या आढळराव यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे. डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांना होत असलेली प्रचंड गर्दी विजयाची नांदी ठरली आहे.
– पोपटराव गावडे, माजी आमदार