मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा ठपका ठेवत मंगळवारी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. मात्र महाड येथील न्यायालयाने त्यांना रात्री उशिरा दिलासा देताना जामीन मंजूर केला. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत भाष्य केले.
राणे यांनी यावेळी, मुख्यमंत्र्यांच्या काही वक्तव्यांचा दाखला देत त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. ठाकरे यांची योगी आदित्यनाथ, प्रसाद लाड व अमित शाह यांच्याबाबतीतील वक्तव्य राणे यांनी यावेळी वाचून दाखवली. तसेच राणे यांचे संस्कार काढणाऱ्या शरद पवार यांना त्यांनी, ‘काय सुसंस्कृत व्यक्ती बसवलाय?’ असा उपरोधिक टोला लगावला.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी आपली टीका यापुढे देखील चालूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र यापुढे टीका करताना भाषेच्या मर्यादा पाळल्या जातील असे देखील राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत असल्याचे अनेकदा दिसून आले होते. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करताना, ‘मुख्यमंत्री महोदय’ असे आदरार्थी शब्द वापरले.
तत्पूर्वी, जामीन मंजूर करताना न्यायालयाने राणे यांना असे वर्तन पुढे करणार नाही अशी अट घातली होती. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना न्यायालयाच्या अटीचे राणे यांच्याकडून पालन झाल्याचे दिसले.