पुणे – जिल्हा परिषदेत नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून विविध कागदपत्रांचा निपटारा करण्यासाठी “झीरो पेन्डसी’ची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले. मात्र, अनेक कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुकीत असल्यामुळे कामाचा वेग काहीसा कमी होता. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून पुन्हा 15 दिवसांची (30 जानेवारी) मुदतवाढ दिली आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून 1 ते 15 जानेवारीदरम्यान हा प्रकल्पला राबविण्यात आला. पहिल्या दिवसापासून अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सर्व कागदत्रांची वर्गवारी लावून, त्याचे गठ्ठे तयार करण्यात येत आहे. कायमस्वरुपी, तीस वर्षांसाठी यासह शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे हे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू आहे.
मात्र, या दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका आल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील काही अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या कामात होते. त्याचा परिणाम प्रकल्पावर झाला. आतापर्यंत जवळपास झिरो पेंन्डसीचे 50 ते 55 टक्के काम मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.
त्यामध्ये जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशान, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण, बांधकाम, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता व पाणी, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, समाजकल्याण यासह अन्य विभागांचा समावेश आहे.
मात्र, हे काम शंभर टक्के पूर्ण व्हावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 30 जानेवरीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामध्ये शनिवारीही कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून हे काम मार्गी लावावे, असा सूचना आहेत. या मोहिमेचे समन्वयक अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यावर जबाबदारी आहे.