मुंबई – भारताच्या 2011 विश्वचषक स्पर्धेतील विजयात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा तसेच आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकण्याऱ्या भारतीय स्टार क्रिकेटर व डावखुरा फलंदाज युवराज सिंगने सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
यावेळी त्याने भारताने 2011 मध्ये विश्वचषक जिंकला हा माझ्यासाठी संस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. तसेच या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू, चार वेळा सामन्याचा मानकरी ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची कामगिरी होती. त्याच वर्षी मला कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र खेळाडू असल्यामुळे मी या संकटाशीही यशस्वी झुंज दिली. असंख्य चाहत्यांच्या सदिच्छा व माझ्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तद्यांनी घेतलेले परिश्रम यामुळे मी मरणाच्या दारातून परत आलो. त्यानंतर क्रिकेट संघटकांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच आणखी काही वर्षे खेळू शकलो. आता मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होण्याबाबत प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात त्यामुळेच मी अतिशय समाधानाने पूर्णविराम केला आहे असे युवराज याने सांगितले.