नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी वरुण गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्राला घेरले असून सैन्यात भरती न झाल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेचा दाखला देत मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. याबाबत ट्विट करताना वरुण गांधी यांनी, ‘गेल्या तीन वर्षांपासून थांबलेल्या लष्कर भरतीमुळे अनेक तरुणांनी वयोमर्यादेची अट ओलांडली आहे. यामुळे त्यांना नैराश्याने घेरलं आहे.’ असं म्हंटलंय.
आपल्या ट्विटमध्ये पुढे वरून गांधी यांनी तरुणाच्या शेवटच्या शब्दांचा उल्लेख करत, ‘बापू, या जन्मात सैनिक होऊ शकलो नाही, पुढचा जन्म घेतला तर मी नक्कीच सैनिक होईन’. अखेर या कष्टकरी तरुणांची कैफियत सरकार कधी ऐकणार, असा सवाल उपस्थित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी जिल्ह्यातील मुंधळ भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वृत्तानुसार, तरूणाने त्याच मैदानातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली, जिथे तो सैन्यात भरती होण्यासाठी अनेक दिवसांपासून सराव करत होता. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. जवळच्या तरुणांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने सैन्याच्या तीन भरती प्रक्रियांमध्ये भाग घेतला होता. लेखी, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण देखील झाला होता, परंतु अंतिम कटऑफमध्ये त्याला स्थान मिळाले नाही.
तरुणाच्या पालकांनी एफआयआर नोंदवू नये, अशी विनंती पोलिसांकडे केली होती. तरी ग्रामस्थांच्या विनंतीनंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तरुणाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलाचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते, पण कोरोना महामारीमुळे त्याचे स्वप्न भंगले. लष्कराने गेल्या तीन वर्षांत भरती मोहीम राबवली नाही. त्यांच्या मुलाने पात्रतेची उच्च वयोमर्यादा ओलांडली होती.