भगवानबाबांनी वंचित घटकाला प्रगतीचा मार्ग दाखविला : सावरगाव येथे दसरा मेळावा
पाथर्डी – तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना 300 खासदारांचे बळ दिले. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यात काश्मीरमधील कलम 370 हटवून काश्मीर भारताला जोडला. गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामे मोदी सरकारने मार्गी लावली असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या घाट सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर आयोजित दसरा मेळाव्यात शहा बोलत होते. यावेळी शहा यांच्या हस्ते विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. प्रितम मुंडे, भुपेंद्र यादव, पालकमंत्री राम शिंदे, महादेव जानकर, विजय पुराणिक, ओमराजे निंबाळकर, सुजय विखे, मोनिका राजळे, भिमराव धोंडे, जयदत्त क्षिरसागर, सविता गोल्हार, यशश्री मुंडे, गोविंद केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहा म्हणाले, कलम 370 हटवण्यास विरोध करणाऱ्याला जाब विचारा. 70 वर्षे ओबीसी व वंचित समाजाला विरोधकांनी झुलवत ठेवले. कायदेशीर आरक्षण दिले नाही. वंचित समाजाला कायदेशीर दर्जा देण्याचे काम मोदी सरकारने केले. राज्यातही फडणवीस सरकारने वंचित घटकासाठी चांगले काम केले. पंकजा मुंडे यांनी आपल्या मंत्री पदाच्या माध्यमातुन सामान्याला न्याय दिला.असे सांगून शहा म्हणाले, संत भगवान बाबांनी वंचित घटकाला प्रगतीचा मार्ग दाखवला. शिक्षणाचे महत्व पटवून स्वाभिमानी जीवन जगण्याची शिकविले. संत भगवान बांबांच्या विचारावर मार्गक्रन करत स्व.गोपीनाथ मुंडेंनी ऊसतोडणी कामगारांच्या उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य वेचले.
या दोन्हींनी महान व्यक्तींनी दाखवलेल्या मार्गावर चालत पंकजा मुंडे त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. भगवान भक्ती गडावर उभारलेले स्मारक देशातील वंचित घटकांना शेकडो वर्ष भगवान बाबांच्या विचारांची शिकव देत राहील, असा ते म्हणाले. मुंडे म्हणाल्या, भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावा वंचितांची चेतना भूमी आहे.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. राज्यातील ऊस तोडणी कामगारांना मेळाव्यातून स्वर्गीय मुंडे साहेब संदेश द्यायचे. अनेक रंगाचे धागे एकत्र करण्याची शक्ती राष्ट्रभक्तीत आहे. राष्ट्रभक्तीचा एकमेव धागा बांधण्यासाठी आपण याठिकाणी जमलो आहोत. खा. प्रितम मुंडे यांनी प्रास्ताविक केले.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
राज्याच्या काना कोपऱ्यातुन लाखोंचा जनसमुदाय मेळाव्याला उपस्थित राहिल्याने परिसरातील सर्व रस्ते गर्दीने फुलुन गेले होते. दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी पाच किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने भाविकांनी सभास्थळी पायी यावे लागले. सभा संपल्यानंतर सुमारे तीन तास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतुक कोंडी झाल्याने अनेकांनी वाहने शेतातुन घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.
370 तोफांची सलामी
आयोजकांकडून अमित शाह यांना 370 कलम रद्द केल्यामुळे 370 तोफांची सलामी आणि 370 तिरंग्या झेंड्यांनी त्यांचे स्वागत केले. तर सभास्थळी एक लाखापर्यंत भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.