मुंबई – माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील काळाचौकी येथे नविन शिवसेना शाखेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, जे बिकाऊ होते ते गेले आहेत, आता फक्त निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. मला भेटायला येताना फुलांचे गुच्छ नकोत तर पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्राचे गठ्ठे हवेत.
दरम्यान, यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह बंडखोर आमदार आणि भाजप पक्षावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, काही जण म्हणतात की आम्हाला बंडखोर म्हणू नका.. तुम्ही बंडखोर नाही तर हरामखोर आहेत. तसेच भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, शिवसेना ही हिंदूत्वासाठी राजकारण करते तर भाजप हा पक्ष राजकारणासाठी हिंदूत्वाचा वापर करतो. मराठी माणसाला संपवण्याची आणि शिवसैनिकांमध्ये फूट पाडण्याची ही चाल आहे.
यावेळी ठाकरे यांनी गणपतीकडे मागणे मागितले. ते म्हणाले, बाप्पा तुझ्या आगमनाच्या आधी हे सर्व संकट मोडून पुन्हा शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावरच नाही तर भारतावरही फडकू दे. यावेळी त्यांनी सदस्य नोंदणी आणि पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र जमा करण्यावर भर दिला असल्याचे दिसून आहे.