कोलोंबो – श्रीलंकेत आंदोलकांनी आपले आंदोलन यापुढच्या काळातही शांततेने आणि अहिंसात्मक मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. गॅले फेस येथील आंदोलकांवर प्रशासनाने केलेली कारवाई अघोरी आणि क्रूर असल्याची टीकाही आंदोलकांच्यावतीने करण्यात आली. शांततेने करण्यात येत असलेल्या या आंदोलनावरील कारवाईचा निषेध एका पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
श्रीलंकेतील जनता गेल्या 105 दिवसांपासून आंदोलन करत असल्याचे आंदोलकांच्या नेत्याने या पत्रकार परिषदेत सांगितले. अध्यक्षांच्या सचिवालयाजवळ गॅले फेस येथे शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर लष्कर आणि पोलिसांनी कठोर कारवाई केल्याच्या पार्श्वभुमीवर आंदोलकांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.
दिनांक 22 जुलै रोजी पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली होती. हे आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होते. तरी ही कारवाई का करण्यात आली, हे न समजण्यासारखे आहे. ही कारवाई राक्षसी होती, असे या आंदोलकांनी सांगितले.
पोलिसांनी या आंदोलकाना आंदोलनस्थळापासून बळाने हटवले होते. मात्र 8 तासांनंतर आंदोलक या ठिकाणी पुन्हा एकदा एकत्र आले होते. त्यानंतर तुरळक प्रमाणात हिंसकआंदोलन होतच राहिले होते. जर त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती, तर ती न्यायोचित ठरली असती, असे एका अन्य आंदोलकाने सांगितले.
या कारवाईला अध्यक्ष रनिल विक्रमसिंघेच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अमेरिकेचे श्रीलंकेतील राजदूत, युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगानेही श्रीलंकेच्या प्रशासनाने केलेल्या या कारवाईवर टीका केली होती.