पुणे -भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुणे शहरात पुढील 24 तास यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये 31 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात अनुकूल स्थिती नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे आणि येत्या काही दिवसांत राज्यात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुणे वेधशाळेचे हवामान आणि अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. मात्र येत्या काही दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो.
मान्सून परतीच्या वाटेवर?
मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. “सध्याची परिस्थिती बघता परतीच्या पावसाबद्दल आम्ही कुठलाही अंदाज बांधलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल,’ असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.