जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत दिला धीर
यवत-करोना विषाणूचा देशभर फैलाव वाढत चालला आहे. या फैलावाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे ज्याचे हातावर पोट आहे, अशा कुटुंबांची उपासमार होऊन परवड होत आहे. अशा कुटुंबांना मदतीची हात देण्यासाठी यवत (ता. दौंड) येथील तीन माजी उपसरपंचांनी धाव घेतली आहे. या तीन उपसरपंचांनी गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत त्यांना मदतीचा हात देत धीर देण्याचे काम केले आहे.
यवत येथील इंदिरानगर, सहकारनगर, यवत स्टेशन या भागात मोठ्या संख्येने स्थलांतरित कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ही कुटुंबे मोलमजुरी, छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबांची उपजीविका करीत आहेत. मात्र आठ दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे या कुटुंबांच्या हाताला काम नाही. त्यामुळे या कुटुंबांची उपासमार होत होती. सामाजिक जाणीवेच्या भावनेतून यवत येथील सदानंद दोरगे, सुभाष यादव आणि नाथदेव दोरगे हे तिघे माजी उपसरपंच या गरीब कुटुंबांच्या मदतीला धावून आले असून त्यांनी या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांना धीर दिला. यामध्ये सदानंद दोरगे यांनी इंदिरानगर येथील तीनशे कुटुंबांना प्रति कुटुंब दहा किलो गहू असा तीन टन गहू मोफत वाटप केला.
सुभाष यादव यांनी सहकारनगर व यवत स्टेशन येथील 115 कुटुंबांना गहू, तांदूळ, तेल, साबण, डाळ, मीठ असे जीवनावश्यक वस्तू दिल्या. तसेच सुभाष यादव यांनी सहकारनगर येथील झोपडपट्टी भागात स्वतः पाठीवर पंप घेत जंतुनाशक औषध फवारणी केली. तसेच नाथदेव दोरगे यांनी सहकारनगर येथील शंभर कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो गहू वाटप केले. या गरीब कुटुंबांच्या मदतीला हे तीन माजी उपसरपंच धावून आल्याने या कुटुंबांनी या तिघांचे आभार मानले आहेत.