यवत (प्रतिनिधी) : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा 2 दिवसांनी (शनिवार दि.25 ) यवत (ता.दौंड) येथे मुक्कामी येत आहे. त्यापुर्वी गुरुवार (दि.23)रोजी दुपारी तीन वाजनेच्या सुमारास यवत परिसरात पावसाने हजेरी लावली. पाऊस बरसल्या नंतर सेवा रस्त्यावर भुलेश्वर फाटा ते काळभैरवनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारा समोरच अनेक ठिकाणी पाणी साचून राहिलेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर स्टेशन रोड प्रवेशद्वार ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साठलेले असुन सेवा रस्ताशेजारी बांधलेल्या गटारीतुन पाणी न वाहता रस्तावरुनच वाहत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे व संभंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून सेवा रस्तावर मंदिराशेजारी असलेल्या पुलावर देखील रस्ता सुस्थितीत करण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर पाणी साचून तयार झालेल्या तळ्यामुळे पुन्हा वारकऱ्यांना चिखल तुडवावा लागतो कि काय? असा प्रश्न आता यामुळे उपस्थित झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच पालखी मुक्कामी ठिकाणाची अधिकाऱ्यांकडून स्थळपाहणी करण्यात आली होती, त्यावेळी अधिकाऱ्यांना सर्व तयारी जवळपास पूर्ण झाल्याचा दावा देखील संबंधित विभागाकडून व त्यांच्या अधिकारी यांच्याकडून करण्यात आल्याची चर्चा नागरिकांनमध्ये आहे. परंतु आज झालेल्या पावसाने अधिकारी व संबंधित विभागाची पोल खोलल्याचे देखील बोलले जात आहे.
या परिस्थितीत वारकरी यांना कसरत करावी लागू शकते. पालखी आली कि तात्पुरता स्वरुपात डागडुजी करून दुरुस्ती केली जाते. याऐवजी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहे.