पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक भरतीसाठी ऑनलाइन “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी'(टेट) परीक्षा सुरू असून या परीक्षेतील पेपर कठीण असल्याचा दावा परीक्षार्थींनी केला आहे. तर, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न मोठे असून ते वाचून सोडविण्यासाठी वेळ लागत असल्याने पेपर पूर्ण सोडवून होत नाहीत. यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येवू लागला आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी उपरोक्त चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 2 लाख 39 हजार 726 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. ही परीक्षा घेण्याचा ठेका “आयबीपीएस’ कंपनीला देण्यात आला आहे.
22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा 200 गुणांची आहे. यात 200 प्रश्न विचारले जात आहेत. परीक्षेसाठी वेळ दोन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. अभियोग्यता या घटकावर 120 प्रश्न व बुद्धिमत्ता या घटकावर 80 प्रश्न विचारले जात आहे. अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी, मराठी), अवकाशीय क्षमता, कल, समायोजन या उपघटकांचा समावेश आहे. बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान आदी उपघटकांचा समावेश केलेला आहे.
ऑनलाइन परीक्षेत निश्चित अभ्यासक्रमावर प्रश्न विचारण्यात येत आहेत. प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रकारच्या चुका झालेल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या परीक्षेबाबत कोणत्याही स्वरुपाच्या लेखी तक्रारी अद्यापपर्यंत दाखल झालेल्या नाहीत, असे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमुळे उमेदवारांचे टेन्शन आणखी वाढू लागले आहे. एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग परीक्षांपेक्षाही शिक्षक भरतीची ही परीक्षा अवघड चालली आहे. एक प्रश्न वाचून सोडविण्यासाठी पाच मिनिटांचा कालावधी लागत असल्याने पेपर अपूर्णच राहत आहेत. परीक्षेचा निकालही “टफ’ लागण्याची शक्यता आहे.
– विठ्ठल सलगर, उमेदवार