राजगुरूनगर -खेड तालुक्यातील दुसऱ्या लाटेत जानेवारी ते मे 2021 या पाच महिन्यात शून्य ते 18 वयोगटातील 902 मुलांना करोना झाल्याचे आकडेवारीतून उघड झाले असून करोनाबाधित 902 ही मुले आजारातून मुक्त झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
देशात तिसरी लाट येण्याची भीती आहे. या लाटेत लहान मुलांना जपण्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. एकीकडे करोनाचे संक्रमण तालुक्यात कमी होत आहे तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वर्तवला जात आहे.
तालुक्यात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कुटुंबातील लहान मुलांसह सार्वजनिक ठिकाणी जाताना दिसत आहेत. पोलिसांकडून त्यांना अटकाव केला जातो; मात्र त्यांची नजर चुकवून दुकाने, मॉल, हॉटेल्स व कपड्याच्या खरेदीला गर्दी होत आहेत.
तालुक्यात करोनाच्या महामारीत अनेक मुलांचे आई किंवा वडिलांना गमावले आहे. अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे. अनेक आईवडिलांना आपल्या एकुलत्या एक मुलाला गमवावे लागले. अशा कटू वेदना देणाऱ्या घटना तालुका व परिसरात घडल्या आहेत.
करोनाच्या जीवघेण्या काळात अनेकांची मानसिक स्थिती बिघडली. अनेकांचे संसार मोडले आहेत. अनेक मित्र-मैत्रिणीना पोरके झालो आहोत. गावागावांत करोनाने धुमाकूळ घातला आहे.
तसेच उपचार केल्यानंतर डॉक्टरांची भरमसाठ बिले भरली. तर अनेकांवर आपली घरे-दारे विकण्याची वेळ आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. या कुटुंबांना आता जीवनाची संघर्षमय लढाई करावी लागत आहे.
आता तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी घेण्याची आणि त्यांना या काळात जपण्यासाठी पालकांनी आतापासूनच काळजी घेणे महत्वाचे ठरणार आहे.
गटनिहाय आढळलेली करोनाबाधित मुले
तालुक्यात जानेवारी ते मे 2021 या पाच महिन्यांत तालुक्यात शून्य गटात 4, एक वर्षाची 16, दोन वर्षांची 37, तीन वर्षांची 32, चार वर्षांची 27, पाच वर्षांची 40, सहा वर्षांची 35, सात वर्षांची 33, आठ वर्षांची 44, नऊ वर्षांची 29, दहा वर्षांची 43, अकरा वर्षांची 53, बारा वर्षांची 59,
तेरा वर्षांची 57, चौदा वर्षांची 59, पंधरा वर्षांची 63, सोळा वर्षांची 65, सतरा वर्षांची 90 आणि अठरा वर्षाची 116 मुले-मुली असे एकूण 902 मुले करोनाबाधित झाली होती. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार केल्यानंतर ती पूर्णतः बरी झाली आहेत. तालुक्याच्या दृष्टीने ही दिलासादायक घटना आहे.