बिजिंग – भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या “क्वाड्रिलॅटरल’च्या बैठकीपूर्वी चीनने पुन्हा भारताला डिवचले आहे. भारताने विरोध दर्शवलेला असतानाही चीनच्या संसदेने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे भारत आणि चीनमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील अरुणाचलला लागून असलेल्या तिबेट प्रांतामध्ये चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी धरण बांधणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनच्या पूर्व सीमेवर सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भारताला डिवचण्याच्या उद्देशानेच घेण्यात आल्याचे समजते.
चीन याच वर्षापासून म्हणजे 2021 साली या महत्वकांशी प्रकल्पाचे काम हाती घेणार आहे.
चीनच्या 14 व्या पंचवार्षीक योजनेत या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे. “ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार पॉवर कंस्ट्रक्शन कॉर्परेशन ऑफ चायना’चे अध्यक्ष यांग जियोंग यांनी चीन यारलुंग जंग्बो नदीवर धरण बांधून जलविद्युत प्रकल्प सुरु करणार आहे, असे सांगितले. देशाची सुरक्षा आणि पाणीसाठ्यासंदर्भातील धोरणासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, असेही चीनने म्हटले आहे. यंदाच्या पंचवार्षिक योजनेत या प्रकल्पाचा समावेश करुन 2035 पर्यंत या प्रकल्पाचा दिर्घकालीन उपयोग करण्याच्या दृष्टीने वित्तपुरवठा करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण आशिया खास करुन भारताला लागून असलेल्या सिमेवर चीन मोठ्या जोमाने विकासकाम हाती घेताना दिसत आहे. याच विकास कामांअंतर्गत असणाऱ्या अनेक प्रकल्पांपैकी ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे समार्थ्य चीनला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बांगलादेशलाही धोका
चीनमधील सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे धरण तिबेटमधील मेडोग काउंटीमध्ये उभारण्यात येणार आहे. हा प्रदेश भारताच्या अरुणाचल प्रदेशपासूनच खूपच जवळ आहे. चीनने यापूर्वीही ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक लहान धरणे उभारली आहेत. मात्र सध्या चीन विचार करत असणारे धरण खरोखरच महाकाय असणार आहे. ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारतातील राज्यांबरोबर बांगलादेशमधील प्रमुख नदी आहे. लाखो लोकांची उपजिविका या नदीवर अवलंबून आहे. चीनने या नदीचं पाणी आडवून धरलं तर ईशान्य भारताबरोबरच बांगलादेशमध्येही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.