नवी दिल्ली – तब्बल 33 वर्षांच्या खंडानंतर प्रसारित झालेल्या रामायण या मालिकेने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. जगात सर्वांधिक पाहिला गेलेला दूरचित्रवाणीवरील (टीव्ही) कार्यक्रम म्हणून त्या मालिकेची नोंद झाली आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात सर्वप्रथम 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर दूरदर्शन नॅशनल म्हणजेच डीडी नॅशनल या वाहिनीवरून रामायण मालिकेचे पुन:प्रसारण सुरू झाले. त्या मालिकेने पुन्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यातून 16 एप्रिल या दिवशी रामायणच्या नावे जागतिक विक्रम नोंदला गेला. त्या दिवशी जगभरातील सुमारे 7 कोटी 70 लाख प्रेक्षकांनी ती मालिका पाहिल्याची माहिती डीडी नॅशनलकडून देण्यात आली.
ज्येष्ठ दिग्दर्शक रामानंद सागर यांची रामायण मालिका सर्वप्रथम 1987 मध्ये दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आली. त्यावेळी ती मालिका प्रचंड प्रेक्षकप्रिय ठरली. त्या मालिकेचे गारूड आजही कायम असल्याचे वर्ल्ड रेकॉर्डमुळे स्पष्ट झाले आहे. त्या मालिकेचे पुन:प्रसारण 18 एप्रिलला पूर्ण झाले. त्यानंतर उत्तर रामायणचे पुन:प्रसारण सुरू करण्यात आले. त्या मालिकेचा अंतिम भाग शनिवारी प्रसारित झाला. आता उद्यापासून (रविवार) सागर यांच्याच श्रीकृष्ण मालिकेचे फेरप्रसारण केले जाणार आहे.