अहमदाबाद – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. त्यासाठी त्यांनी संसदेची नवी इमारत, चांद्रयान-3 मोहीम, जी-20 शिखर परिषद आणि महिला आरक्षण विधेयकाचा आधार घेतला.
त्यातील एक-एक काम करण्यास 50 वर्षांचा अवधी लागला असता. मात्र, मोदींनी ती चारही कामे अवघ्या 3 महिन्यांत पूर्ण केली, असे प्रशंसोद्गार शहांनी काढले.
मोदींच्या कार्याचा झपाटा पाहता त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने भारताला आपले जगातील स्थान मिळवून देण्याचा निर्धार केल्याचे सूचित होते, असे शहा एका मेळाव्यात बोलताना म्हणाले. महिला आरक्षण विधेयक अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र, मोदींनी ते मार्गी लावले. त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) नवचैतन्य आणले.
आता चंद्रावर तिरंगा पाहणे ही केवळ देशासाठीच नव्हे; तर संपूर्ण जगासाठी भाग्याची बाब आहे. जी-20 परिषदेचे आयोजन अनेक देश करतात. पण, भारताने केलेले आयोजन अतिशय शानदार होते. त्याचे आव्हान सर्वच देशांसाठी पुढील 25 वर्षांसाठी असेल असे अनेक देशांनी एका सुरात म्हटले, असेही शहांनी नमूद केले.