चंदिगड – पंजाबमधील शेतकऱ्यांनी गेल्या 3 दिवसांपासून सुरू केलेले “रेल रोको’ आंदोलन मागे घेतले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सुमारे पंजाब आणि हरियाणातील 600 रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांना फटका बसला आहे.
नुकत्याच आलेल्या पुरात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई, “एमएसपी’ची कायदेशीर हमी आणि संपूर्ण कर्जमाफी यासह विविध मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलक केंद्राविरोधात आंदोलन करत होते.
गुरुवारी सुरू झालेल्या आंदोलनाचा फटका गाड्यांच्या वाहतुकीला बसला असून अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या, शॉर्ट टर्मिनेट केल्या गेल्या किंवा वळवण्यात आल्या. तीन दिवस चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम 581 प्रवासी गाड्या आणि 17 मालगाड्यांवर झाला, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारपासून फरीदकोट, समराला, मोगा, होशियारपूर, गुरुदासपूर, जालंधर, तरन तारण, संगरूर, पटियाला, फिरोजपूर, भटिंडा आणि अमृतसर येथे अनेक ठिकाणी रेल्वेमार्ग रोखले होते.
या आंदोलनामुळे पंजाब आणि हरियाणातील हजारो प्रवासी अनेक ठिकाणी अडकून पडले होते. किसान मजदूर संघर्ष समितीसह अनेक शेतकरी संघटना या तीन दिवसीय प्रतिकात्मक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.