मुंबई – आषाढी एकादशीनिमित्त अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. याच दरम्यान राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण दिले जाणार असल्याने याचा लाखो वारकऱ्यांना फायदा होणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांला 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये दिले जाईल.
अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. दरम्यान, वारीदरम्यान अनेदा अपघाताच्या घटना घडतात. यात काहींचा मृत्यू होतो. तर काही जण जखमी होतात. या वारकऱ्यांच्या कुटूंबातील लोकांना आर्थिक फायदा मिळावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.